सुखदायक उन्हाळा

सुखदायक उन्हाळा

वातावरणातील तापमान वाढून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.उन्हाळ्याच्या आहारामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी/द्रव पदार्थ. वातावरणातील उष्णतेमुळे व त्यामुळे येणाऱ्या घामामुळे शरीरातील द्रवांश कमी होत जातो. हा द्रवांश कमी पडल्यामुळे अशक्तपणा, पायाला गोळे येणे, डोळ्यांची जळजळ, मूतखडा, घेरी येणे, लघवीला जळजळ होणे, नाकातून रक्त येणे इ. अनेक तक्रारी जाणवतात.

उन्हाळ्यामध्ये आहारातील द्रव पदार्थ किती महत्वाचे असतात ते आपण जाणतोच , पण तेच द्रव पदार्थ ऋतूनुसार काही बदल करू घेतल्यास जास्त फायदा देतात.कारण कोणताही पदार्थ आपण आहारात कशा पद्धतीने घेतो यावर त्याचे गुणधर्म अवलंबून असतात किंवा त्याचे फायदे अवलंबून असतात .

वातावरणातील उष्णतेचा शरीरावर परिणाम होऊन जास्त त्रास होऊ नये व शरीरातील द्रवांश कमी होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे . उन्हाळ्यात पुढील द्रव पदार्थ घेतल्यास उन्हाळा नक्कीच सुखदायक होईल.

  • दुध तसेच न घेता गुलकंद घालून घेतल्यास उत्तम .
  • तुळशीचे बी / सब्जा दुधातून / पाण्याबरोबर घ्यावे .
  • पिण्याच्या पाण्यामध्ये वाळा टाकून प्यावा , पाण्यामध्ये साळीच्या लाह्या टाकून घेतल्यासही खूप फायदा होतो .
  • लघवीला जळजळ होत असणाऱ्यांनी धने भिजत घालून ते पाणी घ्यावे .
  • डाळीचे पाणी / भाज्यांचे सूप यांमध्ये कोकम घालून घ्यावे , आमसुलाचे सार दोन्ही जेवणात घेतल्यास हरकत नाही , आमसूल फक्त पाण्यात भिजत घालून ते पाणी घेतल्यासही खूप फायदा होतो .
  • मठ्ठा बनवून कोथिंबीर घालून घ्यावा .
  • साध्या साखरे एवजी पेयांमध्ये खडीसाखरेचा वापर करावा , सोलकढी जेवणाबरोबर घेऊ शकतो , फ्रीजमधील पाण्याऐवजी माठातील पाणी वापरावे .
  • दुधी भोपळ्याचा , कोहळ्याचा ताजा रस, सरबत खूप फायदा देतो .
  • नाचणीची उकड ताक घालून घ्यावी .
  • जास्त प्रमाणात शारीरिक व्यायाम असणाऱ्यांनी किंवा उन्हात खूप काम असणाऱ्यांनी तसेच खेळाडूंनी साध्या पाण्याऐवजी विविध प्रकारची सरबते / नारळपाणी घेण्यावर भर द्यावा , हे सर्व बदल केल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत करते .

Leave a Reply